विद्यार्थी सहाय्य नियम
भारतातील व परदेशातील शैक्षणिक संस्थांत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांकरिता
- इ. ११ वी व १२ वी ,पदविका अभ्यासक्रम, कला, वाणिज्य, शास्त्र या पदवी व शिक्षणशास्त्र पदविका (D.Ed.) अभ्यासक्रमासाठी ,अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषध निर्माण, वास्तूशास्त्र इ. पदवी अभ्यासक्रम व शिक्षणशास्त्र पदवी (B. Ed.), पदव्युत्तर अभ्यासक्रम, इ. शाखेत शिक्षण घेणार्या गरजू, होतकरू व ब्राह्मण जातीच्या चार पोटशाखेतील (कोकणस्थ, देशस्थ, देवरूखे, कऱ्हाडे) विद्यार्थ्यास मंडळ आर्थिक साहाय्य करील. ईतर नवीन सुरू झालेल्या विद्याशाखांचासुद्धा विचार करण्यात येईल.
- अशा साहाय्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांकडून विहित नमुन्यात प्रतिवर्षी आवेदनपत्र भरून आले पाहिजे. आवेदन पत्राचा नमुना मंडळाच्या संकेत स्थळावर मिळेल. (www.bvsmthane.com)
- अशा आवेदनपत्रावर व्यवस्थापक मंडळ निर्णय घेईल व तो अनुकूल/प्रतिकूल निर्णय विद्यार्थ्यास कळवण्यात येईल.
- विद्यार्थी लागोपाठ दोन वेळा अनुत्तीर्ण झाल्यास अगर परीक्षेस न बसल्यास साहाय्य बंद करण्यात येईल. परंतु कोणत्याही योग्य कारणास्तव अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत साहाय्य चालू ठेवण्याचा अधिकार व्यवस्थापक मंडळास आहे किंवा इतर कोणत्याही योग्य कारणास्तव साहाय्य बंद करण्याचा अधिकार व्यवस्थापक मंडळास आहे. तसेच हे कारण कळवण्यास मंडळ बांधील नसेल.
- विद्यार्थी वार्षिक परीक्षेस अथवा विद्यापीठाच्या परीक्षेस न बसल्यास अथवा अनुत्तीर्ण झाल्यास तसे होण्याची कारणे १५ दिवसाच्या आत मंडळाच्या कार्यवाहांकडे खुलासेवार कळवली पाहिजेत. याप्रमाणे पुढील शिक्षण चालू ठेवणार किंवा नाही याचाही खुलासा वरील कालावधीत मंडळाकडे अवश्य केला पाहिजे.
- शेवटचे अर्थसाहाय्य घेतल्यापासून तीन वर्षाच्या आत संपूर्ण रकमेची परतफेड केली तर व्याज आकारण्यात येत नाही. याप्रमाणे परतफेड न केल्यास त्यावेळी येणे रक्कमेवर मदत घेतलेल्या पहिल्या दिनांकापासून प्रतिवर्षी ९% दराने व्याज आकारण्यात येईल. विद्यार्थ्यास नोकरी लागण्यावर अथवा त्याने स्वत:चा व्यवसाय चालू करण्यावर परतफेड अवलंबून असणार नाही. व्यवस्थापक मंडळास सर्व रक्कम एकरकमी व्याज मुद्दलासह परत मागण्यास प्रस्तुत नियमाने बाधा येत नाही. व्यवस्थापक मंडळास सर्व रक्कम व्याजसाहित मागण्याचा तसेच योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार राहील.
- जर विद्यार्थ्याने शिक्षणाच्या फक्त पहिल्या वर्षी साहाय्य घेतले आणि पूढील वर्षी साहाय्य नको असेल तर तसे मंडळास कळविणे अनिवार्य राहिल. तसेच शिक्षण पूर्ण झाल्याचेही कळविणे बंधनकारक आहे. तरच परतफेड करण्यासाठी शिक्षण संपल्यापासून तीन वर्षांची मुदत मिळेल अन्यथा साहाय्य घेतल्यापासून तीन वर्षात संपूर्ण परतफेड करावी लागेल. तसे न केल्यास साहाय्य घेतलेल्या दिनांकापासून ९% दराने व्याज आकारण्यांत येईल.
- मंडळांकडून साहाय्य घेणार्या विद्यार्थ्याने शिकत असता व पूर्ण परतफेड होईपर्यंत घेतलेली रक्कम परत करण्याबद्दल जामिनदार म्हणून त्याचे पालक व दोन लायक जामिनदार दिले पाहिजेत. त्यापैकी शक्यतो एक जामिनदार बिगर नातेवाईक असावा. दोन्ही जमीनदारांचे उत्पन्न किमान पाच लाख असावे. तसेच एक जामीनदार नोकरदार असावा. विद्यार्थ्याने घेतलेल्या सर्व रकमेस विद्यार्थी व जामीनदार संयुक्त पणे अथवा वैयक्तिक रित्या जबाबदार राहतील. ह्या सर्वांनी विहीत नमुन्यात वचन चिठ्ठी ( Promissory note ) लिहून दिली पाहिजे.
- मंडळाकडून घेतलेल्या साहाय्याची पूर्ण परतफेड होण्यापूर्वी जर एखादा जामिनदार मयत अथवा नादार झाल्यास दुसरा जामिनदार ताबडतोब दिला पाहिजे. तसे न केल्यास येणे असलेली सर्व रक्कम विद्यार्थ्याकडून त्वरित सव्याज वसूल केली जाईल.
- एकाच कुटुंबातील दोन किंवा अधिक विद्यार्थी सहाय्य घेणार असल्यास प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र जामीनदार असले पाहिजेत.
- विद्यार्थी अज्ञान असल्यास वचनचिठ्ठी विद्यार्थ्याचे पालक व जामीनदार यांनी संयुक्तपणे लिहून द्यावी लागेल.
- सहाय्य सम्मत होताच त्यावेळी प्रचलित असलेली विद्यार्थी सभासद वर्गणी भरून मंडळाचे सभासदत्व स्वीकारले पाहिजे. तसे केल्यानंतरच मदतीचा धनादेश मिळेल. विद्यार्थी सभासद वर्गणी खाली नमूद केलेल्या मंडळाच्या बँक खात्यामध्ये जमा करावी आणि त्याचा स्क्रीनशॉट मंडळाच्या भ्रमणध्वनी (मोबाइल) वर WhatsApp द्वारे पाठवावा.
Name: Brahman Vidyarthi Sahayyak Mandal
Bank of Maharashtra, Thane Station Road Branch
Account No. 20003404172
IFSC: MAHB0000022 - परदेशी जाणार्या विद्यार्थ्यांसाठी फक्त एकदाच एकरकमी अर्थसाहाय्य दिले जाईल व मदत दिल्यापासून तीन वर्षात त्याची परतफेड करावी लागेल.
- परदेशी ज्या संस्थेकडे शिक्षणासाठी जायचे असेल त्या संस्थेकडील परवानगी,प्रवासासाठी लागणारा पासपोर्ट, व्हीसा, वगैरे आवश्यक अशा सर्व कागदांचा मूळ प्रती पाहण्यासाठी हजर केल्या पाहिजेत व त्याच्या छायाप्रती मंडळाकडे दिल्या पाहिजेत.
- शिक्षणक्रम किती मुदतीचा आहे हे स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे
- शिक्षण संस्थेचा आणि स्वतःचा ईमेल अॅड्रेस देणे बंधनकारक आहे.
- शिक्षणक्रमाचे कालावधीत शिक्षण संस्थेकडून काही शिष्यवृत्ती/ विद्यावेतन मिळणार असेल तर तसा स्पष्ट उल्लेख आवेदनपत्रात करणे आवश्यक आहे.
- कागदपत्रांच्या सूचीनुसार सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यावरच अर्थसाहाय्य मंजूर केले जाईल.

